आळंदी - संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी अकरा दिवसांचा सुमारे तीनशे किलोमीटरचा प्रवास करत श्रीमंत ऊर्जितसिंह शितोळे सरकार यांचे मानाचे अश्‍व बुधवारी (ता. २२) आळंदीत दाखल झाले.

माउलींच्या पालखी सोहळ्यात परंपरेने कर्नाटकातील अंकली गावचे शितोळे सरकार यांचे मानाचे दोन अश्‍व येतात. त्यामध्ये एक स्वाराचा आणि दुसरा माउलींचा अश्‍व असतो, अशी वारकऱ्यांची दृढ भावना आहे. पंढरपूरला पालखी जाताना सोहळ्यात भोई दिंडीमागे हे दोन्ही अश्‍व चालतात. त्यामागे इतर सोहळा चालतो.

अंकली गावात ऊर्जितसिंह शितोळे यांनी पूजा केल्यानंतर हे अश्‍व आळंदीच्या दिशेने पुढे १२ जूनला निघाले. म्हैसाळ, सांगलवाडी, पेठनाका, वाहगाव, भटनगाव, भुईंज, शिरवळ, शिंदेवाडी, पुणे असा प्रवास माउलींच्या अश्‍वांनी केला. हे अश्‍व पुण्यातील रास्ते वाड्यात दोन दिवसांपासून मुक्‍कामी होते. दरम्यान, दोन्ही अश्‍व आज संध्याकाळी सहाच्या सुमारास आळंदीत दाखल झाले. गावच्या वेशीजवळ आल्यानंतर शितोळे सरकारांच्या वतीने देवस्थानमध्ये आगमनाचा निरोप देण्यात आला. यानंतर माउलींचे चोपदार राजाभाऊ चोपदार व मालक बाळासाहेब आरफळकर, सोहळा प्रमुख श्‍यामसुंदर मुळे, डॉ. प्रशांत सुरू हे गुरू हैबतबाबांची दिंडी परंपरेप्रमाणे घेऊन अश्‍वांना सामोरे गेले. या वेळी वेशीवर अश्वाचे स्वागत करून वाजतगाजत आळंदीत आणण्यात आले. त्यानंतर कारंजे मंडपात देवस्थानच्या वतीने मानाचे नारळ अश्‍वावरील व्यक्तींना देण्यात आले. नंतर हे अश्‍व फुलवाले धर्मशाळेत विश्रांतीसाठी पाठविण्यात आले. त्यानंतर भाविकांनी अश्‍वांच्या दर्शनाचा लाभ घेतला.