राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाचा उपक्रम

येरवडा -
 
"रखुमाई विना नाही माझ्या विठ्ठलाला शोभा,
घरा-घरात असावा बाई माणसाचा ठेवा,
पांडुरंग चरणी माझं एकच साकडं,
संख्या वाढू दे मुलींची देवा जिकडं तिकडं''...
 
असा संदेश देत टाळ-मृदंगाच्या गजरात राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागाने शनिवारी दुपारी "बेटी बचाओ' दिंडी काढली होती. माउलींच्या पालखीचे विश्रांतवाडी येथे आगमन होताच ही जनजागृतीची दिंडी निघाली होती. यामध्ये वारकरी सहभागी झाले होते. त्यांनी भजन, गौळणी गात स्त्रीभ्रूणहत्या थांबविण्याचा संदेश दिला. या वेळी आरोग्य विभाग व प्रादेशिक मनोरुग्णालयाचे कर्मचारी विविध संदेश फलक घेऊन दिंडीत
सहभागी झाले होते.
  
दिंडीच्या अग्रभागी दहा फूट उंचीची बाहुली बेटी बचाओ संदेश देत चालत होती. ही बाहुली सर्वांचेच मोठे आकर्षण केंद्र झाले होते. दिंडीमध्ये उपसंचालक विलास देशपांडे, हिवताप व हत्तीरोग विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी भावना चौधरी यांनी मार्गदर्शन केले. वारकऱ्यांनी भक्तिगीते, भजने, गौळणी सादर केल्या. ही जनजागृती दिंडी यशस्वी करण्यासाठी सहायक संचालक सुरेश तांबे, आरोग्य शिक्षण अधिकारी हरिदास धनवडे, प्रशासन अधिकारी चंद्रकांत जोशी व आरोग्य शिक्षण विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
 
राज्य आरोग्य शिक्षण व संपर्क विभागातर्फे परिवर्तन एक्‍स्प्रेस हे वाहन दिंडीसोबत पंढरपूरला जाणार आहे. आरोग्य प्रदर्शन, माहितीपट, मुद्रित साहित्य या माध्यमातून नागरिकांना माहिती दिली जाणार असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. या वर्षी जनजागृतीचा संपूर्ण भर मुलीच्या जन्माचे स्वागत व प्रसवपूर्व गर्भलिंगनिदान कायदा यावर असणार असल्याचे, देशपांडे यांनी सांगितले.